नमस्कार मंडळी.
हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
मला तर तो अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. म्हणजे असं की , लग्न -मुंजी, शुभकार्य, त्या निमित्ताने होणारी देवाणघेवाण, हौस, बघितल्यावर घ्यावीशी वाटली म्हणून, कुणाला तरी तेवढीच मदत होईल म्हणून...अशा अनेक कारणांमुळे साड्या जमा होतात. कपाटं ओसंडून वहातात.
तीच साडी पुन्हा कुठे नेसायची? यामुळे हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या या साड्या पडून रहातात. इतक्या सुंदर आणि हौशीने घेतलेल्या साड्या द्यायच्या तरी कोणाला आणि किती? कारण आता दुसऱ्याचे कपडे कोण वापरतं?
घरी काम करणाऱ्या देखील नको म्हणतात! जुन्या बाजारात कवडी मोलाने विकत घेतात. कारण अशा साड्यांना मागणी नाही. रोजच्या वापराचे कपडे त्यातल्या त्यात कुणाला हवे असतात. निदान आपण ते खूप वापरतो तरी!
स्त्रियांसाठी काम करणाऱ्या काही संस्थांशी मी संपर्क साधला पण त्यांची उत्तरं अशी होती...
१. आम्ही फक्त पैशात देणगी स्विकारतो
२. आम्ही आदिवासींसाठी काम करतो. त्यांना सुती आणि नऊवारी साड्या लागतात. शक्यतो नवीन द्या किंवा रोख रक्कम द्या.
३. आता आमच्या कडील मुली साड्या नेसत नाहीत.
इत्यादी इत्यादी...
पुनर्वापर करणाऱ्यांना संपर्क केला. अशा साड्यांपासून ते सुंदर, सुंदर पिशव्या,पर्सेस, पडदे,कुशन कव्हर, रजया वगैरे बनवून देतात. म्हणजे त्यासाठी दक्षिणा देऊन वेगळ्या स्वरूपातील ढीग घरातच ठेवायचा.
जरीसाठी साड्या घेणारे असतात पण अलीकडे पैठणीत तरी कुठे खरी जर असते? ( अर्थात खऱ्या जरीची आपण कशाला टाकू?)
अशा अनेक कारणांमुळे मी भंडावून जाते. उघड्या डोळ्यांनी साड्या फेकून द्यायला मन धजावत नाही. पुन्हा एकदा एक अंगावर एक दांडीवर असं जगणं जमेल का हा विचार डोक्यात घोळू लागतो.
तर मंडळी, याबाबत तुमचे काय अनुभव आहेत? आणि हो, यावर तुम्ही काय उपाय करता ते जाणून घेण्यासाठी हा धागा.