पाताळयंत्री या शब्दाचा गर्भित अर्थ आता वेगळ्या रुपात आपल्याला समजतो आहे असे वाटते.
युद्धभूमीवर जेव्हा वरून येणाऱ्या मृत्यूची भीती वाढते, तेव्हा सैन्य नैसर्गिकरित्या जमिनीच्या गर्भात आश्रय शोधू लागते. पाकिस्तानने भुयारी युद्धतंत्र अवलंबले आहे. हा एक अतिशय धूर्त आणि खोलवर विचार केलेला लष्करी डाव आहे. पाकिस्तानने अशा भुयारी मार्गांचे जाळे विणले आहे - असणार. हे जाळे आधुनिक सॅटेलाइट आणि थर्मल कॅमेऱ्यांच्या नजरेला सहज चकवा देत असणार. या रणनीतीचा मुख्य आधार म्हणजे अदृश्य राहून वार करणे, रसद पोहोचवणे. हे बोगदे अनेकदा इतके खोल असतात की वरून होणारी साधी बॉम्बफेक त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. ऑप सिंदूरमध्ये जरी आपण काही महत्त्वाची भुयारे उडवली असली तरी अनेक अशी भुयारे अजूनही असणार हे नक्की. भारतीय सैन्याने या 'पाताळयंत्राला' उत्तर देण्यासाठी तितकीच आक्रमक आणि आधुनिक पद्धत अवलंबली. केवळ मानवी डोळ्यांवर अवलंबून न राहता ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार चा वापर केला.
याच पद्धतीने जर इराणच्या भौगोलिक रचनेचा विचार केला तर हे भुयारी युद्ध तंत्र एका वेगळ्याच आणि अधिक भयानक उंचीवर पोहोचलेले दिसते. अमेरिकेने इतके हल्ले करूनही इराण प्रतिहल्ले केले - असे तो कसे करू शकला? सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीत इराणने आपली अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन तंत्रज्ञान केवळ जमिनीवर न ठेवता झॅग्रोस आणि अल्बोर्झ सारख्या अजस्त्र पर्वतरांगांच्या काळजात दडवून ठेवली असणार. इराणने या कठीण पाषाणात शेकडो फूट खाली क्षेपणास्त्र शहरे वसवली असावीत . अशा प्रदेशांतून ही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अनपेक्षित ठिकाणी थेट जमिनीच्या खालून बाहेर यतात. त्यांचा उगम शोधणेही कठीण जाते. हे केवळ साधे बोगदे नसून संपूर्ण लष्करी तळ असणार आहेत कदाचित तेथे हजारो सैनिक, रसद आणि इंधन कित्येक महिने सुरक्षित राहू शकते. गाझा मध्ये हे तंत्र केलेले दिसून आले आहे. म्हणजे इराणमधे तर नक्की असणार. इराणच्या मध्यवर्ती पठारी भागात आणि विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या डोंगररांगांमध्ये इराणने गुप्त जागा तयार केल्या असाव्यात.
या अवाढव्य पाताळयंत्राला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने लष्करी ताकद आणि इस्राएली विज्ञान पणाला लावले जाणार आहे. कदाचित प्रगत अशा ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार चा वापर करून याचा शोध आधीच लावलेला असणार आहे. या भुयारी शहरांचा अंत करण्यासाठी अमेरिकेचे सर्वात मोठे आणि क्रूर शस्त्र म्हणजे GBU हा १५ हजार किलो वजनाचा महाकाय बॉम्ब. एखाद्या खिळ्याप्रमाणे काँक्रीट आणि कठीण पाषाणाचे २०० फूट जाड थर चिरून थेट बोगद्याच्या मध्यभागी जाऊन फुटतो. यामुळे डोंगरच्या डोंगर आतून कोसळतात संपुर्ण भुयारी जग एका क्षणात जिवंत थडगे बनू शकते.
तार्किकदृष्ट्या पाहिले तर हे युद्ध दीर्घकाळ चालण्याचे मुख्य कारण इराणची ही पाताळयंत्री रणनीतीच आहे. इराणच्या या पर्वतांना फोडून आत शिरणे जवळजवळ अशक्य आहे. जोपर्यंत त्यांचा दारुगोळा साठा आणि लष्करी नेतृत्व या भुयारी जगात सुरक्षित आहे, तोपर्यंत इराण शरणागती पत्करणार नाही असे वाटते. यामुळे हे युद्ध केवळ ताकदीचे न राहता कोणाची सहनशक्ती जास्त आहे यावर येऊन थांबते. अर्थात काय घडेल हे काळ ठरवेल.
आणि हे वरील सर्व अंदाज आहेत.
हे युद्ध कसे पुढे जाईल. पाताळयंत्राला उत्तर काय होऊ शकेल यावर चर्चा करण्यासाठी हा धागा काढत आहे.
येथे अनेक खूप ज्ञानी विचारवंत आहेत त्यांनी या युद्धतंत्रावर अजून प्रकाश पाडावा ही विनंती.
Comments