मी साहित्य !
मी साहित्य !
अनादिअंत मी, अतिप्राचीन मी, जन्म घेतला मी ज्ञानयज्ञातून.
सळसळणा-या तेजशिखांच्या सोनेरी गर्भातून, श्रेष्ठ पंचमहाभूतांच्या आवेगातून अन् मीलनातून, जन्म घेतला त्या ज्ञानकुंडातून, मी - मी साहित्य !
कडेकपारी शिखरे माझी जन्मा आली. शालीनता, स्वातंत्र्य, बंधुता, नीती... मातीची जिवंत झाली.
मुखामुखांतुन साहित्यवेड्या संस्कारांची गुढी उभारली, प्रार्थनांचे नाद निनादत विश्वशांतीच्या पसायदानी.
बंदिस्त कवाडे पुराणांची, उजळली ज्ञानियाच्या सोनकिरणांनी.
आलांछित चंद्रम्याच्या निवांत शीतल चांदण्यातुनी, अन् तापमार्तंडाच्या देदिप्यमान प्रकाशकिरणांतुनी नहाण घेई महाराष्ट्र हा साहित्यवनभुवनी.
“श्रीचावुंडरायें करवीयले, श्रीगंगराजें सुत्तांलें करवीयलें”" विराजित शिलालेखी, उगम पावली गंगोत्री ही साहित्यिकांची.
“तीरें संस्कॄताची गहनें, तोडोनि मराठी शब्दसोपानें”" वदला तो ज्ञानियांचा राजा ह्या साहित्याच्या अनुष्ठानी.
चक्रधराचे ’लीळाचरित्र’ महान ग्रंथ तो शुचितेचा, ’जैसे पाहिजे तैसीची लिहले’ वदले ते महानुभवी. प्रथम साहित्य हे गद्यरूपातले, पण सुबोध सरळ अन् रसाळ ते गीतेवाणी.
फडकत होता स्वाभिमानाने गरुडध्वज ह्या साहित्याचा, पहात होता, सांगत होता इतिहास त्या यादवकुळीच्या नरेंद्राचा.
मांदियाळी साहित्यनिष्ठांची महाराष्ट्राच्या आत्मबळातली निश्चिंत होती, सुखरूप होती ती ज्ञानियाच्या ज्ञानेश्वरीकडे.
“माझा म-हाटाचि बोलु कवतिकें”" म्हणणा-या ज्ञानियाच्या ज्ञानेश्वरीचे सारेच अद्वितीय.
भाषा कशी ? तर सुबोध आणि मधाळ.
शब्दलाघव कसे ? तर कोमल आणि रसाळ.
शब्दकळा तर अमॄताच्या कल्लोळासारखी.
महान ती ज्ञानेश्वरी, तीच तिच्यासारखी, ’परि अमॄतातेंही पैजा जिंकणारी’.
समस्त वारकरी संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ तो ’भागवत’, रचिला तो पैठणच्या एकनाथांनी.
अन् मग उगवला तो संतसूर्य देहूस्थानी. ’तुझा विसर न व्हावा’ हेचि दान मागणारा तो महान तुकोबा.
एकेक स्फुट अभंग जणू एकेक रत्नच. इंद्रायणीत बुडूनही अभंगच राहिलेले हे अभंग, जणू मराठी साहित्याची रेखीव लेणीच. मेणाहुनी मऊ अशा ह्या विष्णुदासांनी प्रसंगी “नाठाळाचे माथी हाणु काठी”" ही वॄत्तीही जाणली. संतभूमी नहात होती, माखत होती भक्तिरसांमध्ये.
आणि-
आणि अचानक घातच झाला, आणि अचानक घातच झाला - नियतीचा आघातच झाला. आनंदाला दृष्ट लागली, दु:खाचा तो डोंबच कोसळला, सूर्याला त्या ग्रहण लागले, चंद्राला घेरले खलांनी, लुटण्यासाठी करून आक्रमण त्या जुलुमांच्या सुल्तानांनी, मसणवटीच करून टाकली महाराष्ट्राच्या कस्तुरीची. रात्रंदिन मग एकच सत्ता- जुलुमांची, अत्याचारांची.…..
पहात होती रयत बिचारी, हतप्रभ ह्या महाराष्ट्राची..
वर्षामागून वर्षे गेली, शतकांमागून शतके गेली,
ज्वालामुखी हा शांतच होता, जरी गेले इतके घडुनी
स्थितप्रज्ञ कुणी योग्यावाणी भासत होता निद्रिस्त, पाप-अनाचार-जुलुमांचा होतच नव्हता अस्त
पण कोंबापारी अक्षयवृक्षाच्या राष्ट्रधर्म तो वाढत होता
सावध होता मुक्तिधर्म तो अलगद पण फोफावत होता
महाराष्ट्राची माती समर्थ, सक्षम होती तो जी जाणता.
आणि
आणि एक दिवस मग आरोळी उठली- “बुडाला औरंग्या पापी”" ह्या समर्थ रामदासियाच्या मुखातुनी.
’उदंड झाले पाणी स्नानसंध्या कराविया’ पाहून समाधानी तो रासबोधी रामदास ह्या ’आनंदवनभुवनी’.
अन मग काळ आला तो काव्याचा, श्लोकांचा, शाहिरी, शॄंगारी लावणी अन आख्यानांचा.
’सुश्लोक तो वानमाचा अन् आर्या ती मोरोपंतांची. पोवाडा तो अज्ञानदासाचा तर लावणी ती रामजोश्यांची’ म्हणे रयत ह्या साहित्यप्रांती.
’बखर’ म्हणता काय लिव्हणे ? बखर म्हणता काय पुसणे ? अहो, “ दोन मोत्यें गळाली, सत्तावीस मोहरा हारपल्या… “ ऐसी अचूक भाषा सांगे ह्या वॄत्तांती.
किती नावं घ्यावीत अन् किती वगळावीत ?
व्याकरणकार दादोबा पांडुरंग अन् मोरोबा दामले ह्या ॠषींचे कार्यच मोठ्ठे, केवळ अतुलनीय.
कोल्हटकर, गडकरी, चिं. वि. जोशी, अत्रे अन् पु.ल. देशपांडे ! महान रत्ने विनोदाची, ह्या साहित्यमुकुटातली.
मर्ढेकर, बोरकर, बी, माधब, गिरीश, करंदीकर, पाडगावकर, केशवसुत, अशी अनंत यादी आणि दिगंत कीर्ती ह्या कवीश्वरांची.
दर्पणकार बाळशात्री जांभेकर, काळकर्ते परांजपे, केसरीपटू टिळक, आगरकरांचे सुधारक ! सदैव ॠणी महाराष्ट्र ह्या सामाजिक बंधनी.
ही खानेसुमारी नव्हेच मुळी महाराष्ट्रदिकांच्या साहित्याची अन् साहित्यिकांची. हे केवळ एक स्मरण, भक्तिभावाने केलेले. सगळ्यांचे नाव घेऊन करायचीही गरज नाही, केवळ त्या त्या शास्त्रांच्या आचार्यांच्या नावाने बिल्वपत्र वाहिले की झाले.
आमचा हाच तो प्रयत्न.
बिल्वपत्र वाहण्याचा ह्या साहित्याच्या चरणी. सगळ्याच नाही, पण आवाक्यात येईल तितक्या.
कर्ती-करविती ती थोर साहित्यदात्री, आम्ही केवळ निमित्तमात्र.
हे चंडमुंडभंडासुरखंडिनी जगदंबे, हे उदंडदंड महिषासुरमर्दिनी दुर्गे,
महाराष्ट्रधर्मरक्षिके तुळजाभवानी ये, साहित्याच्या चरणी पुस्तकविश्वाचं आख्यान मांडलंय,
आई, तू ऐकायला ये !
सप्तसागरांनो या, चंद्रसूर्यांनो या, ग्रहनक्षत्रांनो या, दाही दिशांनो या,
देवदेवतांनो, संतसज्जनांनो, साहित्य गुणवंतांनो, मराठमंडळींनो … अवघे या...
आम्ही "साहित्यदेवते"चे आख्यान "पुस्तकविश्वा"च्या रसात गातोय,
तुम्ही पहायला, वाचायला आणि लिहायला या, या, अवघे अवघे या ...





